महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे हाल सर्वांना ठाऊक आहेत. शेतकरी सततचे असणारे लोडशेडिंग, आणि त्याचा रात्री-अपरात्रीचा असणारा वेळ यामुळे त्रस्त झाले आहेत. शेतातील पिकं वीजेच्या अभावी करपत आहेत. पिकाला व्यवस्थित पाणी मिळत नाही. ही नित्याचीच बाब झाली आहे. यावर ‘नांदेड’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक भलताच उपाय शोधून काढला आहे, तो वाचून तुम्ही चकीत व्हाल.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपल्या घामाचे पैसे देऊन देखील वीज वेळेवर मिळत नाही. रात्री अपरात्रीच्या लोडशेडिंगमुळे अनेक शेतकऱ्यांचा साप चावणे, किंवा काही घात होणे यामुळे जीव गेला आहे. अशावेळी वीज दिवसा मिळावी यासाठी आंदोलन करत आहेत. नांदेड जिल्ह्यात तर रात्री दहानंतर फक्त पाच तास वीज उपलब्ध होते. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी करणे हा उपाय शोधून काढला आहे.
सीमावर्ती राज्य असणाऱ्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा मोफत आहे. तसेच दरवर्षी पीक लागवडीसाठी ‘रयतु बंधू’ या योजनेच्या अंतर्गत एकरी सहा हजार लागवड खर्च तेलंगणा सरकार देते असे या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पटापट तेलंगणामध्ये शेती घेण्यास सुरुवात केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरालगत आणि तेलंगणा सीमावर्ती असणाऱ्या येसगी गावचे रहिवाशी गंगाधर प्रचंड आणि त्यांचे छोटे भाऊ उपेंद्र प्रचंड दोघेही आपली परंपरागत असणारी अठरा एकर शेती कसून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, सततच्या लोडशेडिंगमुळे ते देखील त्रस्त झाले होते.
येसगी हे तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात असून, पाणीदार गाव म्हणून या गावाची ओळख आहे. मुबलक पाणीपुरवठा आहे, शिवाय गावलगतच मांजरा नदीचे विस्तीर्ण आणि बारा महिने डबडबून भरून वाहणारे पात्र आहे. सोमनाथ प्रचंड यांच्यासोबतच अनेक शेतकरी मुबलक पाणी पुरवठा असल्यामुळे भात पीक, सोयाबीन, हरभरा, ऊस, भाजीपाला, केळी, अशी नगदी पिके घेतात.
मात्र, मुबलक पाणीपुरवठा असतानाही विजेच्या लपंडावाने आणि सततच्या लोडशेडिंगमुळे ते मेटाकुटीस आले आहेत. 24 तासातून फक्त पाच तास वीज पुरवठा होत आहे. तर एवढा खटाटोप करूनही शेतीसाठी रात्रीला दहाच्या नंतर फक्त पाच तास वीज मिळत आहे. त्यात परत वीज तारा तुटणं, ट्रान्सफार्मर जळणं यामुळे अधिक खर्च येत.
आता या सगळ्यावर उपाय म्हणून, येथील शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यात शेती खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. गंगाधर आणि उपेंद्र प्रचंड या कुटुंबाने सीमावर्ती असणाऱ्या तेलंगणा राज्यात दोन एकर जमीन खरेदी केली आहे. आता तेलंगणा राज्यात घेतलेल्या या दोन एकर शेतीमुळे गंगाधर प्रचंड यांच्या महाराष्ट्रातील अठरा एकर शेतीला चोवीस तास वीज उपलब्ध झाली आहे.