राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुजराती लोक मुंबईतून निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे कोश्यारी म्हणाले. या वक्तव्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला यावेळी कोश्यारी बोलत होते. भगतसिंग कोश्यारी कार्यक्रमात बोलताना म्हणाले, गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही.
तसेच म्हणाले, राजस्थानी मारवाडी समाजाने व्यावसाय करताना केवळ पैसा कमवला नाही तर शाळा-महाविद्यालये दवाखाने बांधली व गोरगरीबांची सेवा केल्याचं म्हटलं. हा समाज देशात तसेच नेपाळ, मॅरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगत जेथे हा समाज जातो तेथे आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो, असे कोश्यारी म्हणाले.
कोश्यारी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. सावंत यांनी भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत आपले मत मांडले आहे. म्हणाले, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे.
गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे, असे सावंत म्हणाले.
आता राज्यपालांच्या मुंबई आणि ठाणे संदर्भातील वक्तव्यावर राज्यातील राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि मनसे काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या राजभवनाकडून या वादावर काय स्पष्टीकरण देण्यात येणार पाहावं लागेल.