Share

सर्वात पहीले ‘हे’ भोंगे बंद करा; बच्चू कडूंनी दिलेले चॅलेंज सर्वच राजकीय पक्षांना झोंबणार?

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम देखील राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachhu Kadu) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.(bachhu kadu give challenge to all other parties)

आमदार बच्चू कडू यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदीर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा, यातुन प्रत्येकांनी बोध घ्यायला हवा. बंद करायचे असेल तर मंदीर, मशिद, सगळी धार्मिक स्थळे व सर्वात पहिले निवडणूकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे ला औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने देखील राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेला विरोध केला आहे. प्रहार संघटनेने यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे.

मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा उल्लेख ‘हिंदू समाजातील औवेसी’ असा केला आहे. पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

“उत्तर प्रदेशातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने एमआयएमच्या औवेसींचा वापर केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात हिंदू समाजात काही औवेसी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात फूट पडली जात आहे. तसेच दंगली घडवल्या जात आहेत. धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे”, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “नवहिंदू औवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत आहे. पण महाराष्ट्रातील जनता अत्यंत सावध आहे, जागरूक आहे. देशात सध्या दंगली घडवण्याचा कट रचला जात आहे. दिल्लीत जे घडले तेच महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे”, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मुंबईतील मशिदींचा मोठा निर्णय! ७२% मशिदी पहाटेचे भोंगे स्वताहून बंद करणार
बॉलिवूडवर शोककळा! अमिताभ बच्चनला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं दुःखद निधन
मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्य शासनाला अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय?

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now