Valmik Karad : बीड जिल्हा कारागृहात सोमवारी सकाळी दोन गटांमध्ये मोठा वाद उफाळल्याची घटना समोर आली आहे. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा हल्ला गीत्ते गँगच्या महादेव गीत्ते आणि अक्षय आठवले यांनी केल्याचे समजते.
कैद्यांमध्ये जुना वाद उफाळला, नाष्ट्याच्या वेळी हाणामारी
सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास कैद्यांना नाश्ता देण्यात येत होता. यावेळी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले बरेकमधून बाहेर पडले असताना अचानक गीत्ते गँगच्या सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, त्यानंतर त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. वाल्मीक कराडला चापट्या मारण्यात आल्या, तर सुदर्शन घुलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
बबन गीत्तेची सोशल मीडियावर धमकी – “अंदर मारना या मरना सब माफ है!”
हल्ल्यानंतर आता गीत्ते गँगचा म्होरक्या शशिकांत उर्फ बबन गीत्ते याने फेसबुकवर पोस्ट टाकत थेट जीवघेण्या हल्ल्याची धमकी दिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “अंदर मारना या मरना, सबकुछ माफ है!” या धमकीमुळे बीडमध्ये पुन्हा एकदा टोळीयुद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बबन गीत्ते आणि वाल्मीक कराड यांचा जुना वाद
बबन गीत्ते हा सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी आहे. त्याने यापूर्वी वाल्मीक कराडवर आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला होता. आता तुरुंगात गीत्ते गँगने वाल्मीक कराडवर हल्ला केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
तुरुंग प्रशासनाचा हलगर्जीपणा?
मिळालेल्या माहितीनुसार, या गटांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून तणाव सुरू होता. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असला, तरी हल्ला टाळता आला नाही. या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पोलिसांची चौकशी सुरू, गुन्हा दाखल
या हल्ल्याप्रकरणी अधिकृत माहिती अद्याप तुरुंग प्रशासनाने दिलेली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू आहे. बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.