पुणे | हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या-बड्या नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबादेत आहेत. यावेळी प्रचार सभेत बोलताना हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर का होवू शकत नाही? अस वक्तव्य केल.
योगी आदित्यनाथांनी शनिवारी तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मलकजगिरी भागात रोड शो केला. यावेळी त्यांनी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले.
त्यांनी म्हटलं, “इथं आल्यानंतर मला अनेकांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? असं विचारलं. मी त्यांना म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही?”
मुख्यमंत्री योगी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप विरूध्द एआयएमआयएम असा संघर्ष उफाळला आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टिका करत नवीन वादाला तोंड फोडत आहेत. यानंतर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी याप्रकरणात उडी घेतली. ‘हैद्राबादचे नाव बदलणं हेच भाजपाच लक्ष आहे. पण तुमच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील, पण हैद्राबादचं नाव बदलणार नाही’. अस प्रत्युत्तर ओवेसींनी दिल.