Pahalgam Attack : आशिया कप 2025 (Asia Cup 2025) टी-20 सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत सुपर-4 फेरीकडे मोठी झेप घेतली. विशेष म्हणजे हा सामना भारताच्या कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या वाढदिवशी झाला. त्याने जबाबदारीची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि या अनोख्या क्षणी आपल्या देशासाठी खास संदेश दिला.
सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमारने पहलगाम (Pahalgam Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्याने ठाम शब्दांत सांगितले की, “हा विजय आम्ही शूरवीर सैन्यदलाला अर्पण करतो. त्यांनी दाखवलेलं शौर्य अविस्मरणीय आहे. त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही मैदानात लढतो. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकाधिक कारणे निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू,” असा संदेश देत त्याने संपूर्ण देशाला एकजुटीचे आवाहन केले.
एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यावरही मोठा विरोध झाला होता. बीसीसीआय (BCCI Board), केंद्र सरकार आणि खेळाडूंवर दबाव होता. मात्र, या सामन्याने वेगळाच रंग घेतला. भारताने सर्व आघाड्यांवर पाकिस्तानला नामोहरम केले.
यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीमने विरोधकांना दुर्लक्ष करून त्यांना ठोस संदेश दिला. मैदानावर पराभव आणि त्यानंतर मिळालेल्या या अपमानामुळे पाकिस्तानी खेळाडू स्तब्ध राहिले.
या विजयाने केवळ क्रीडा इतिहासात नव्हे तर भावनिक पातळीवरही भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. सूर्यकुमार यादवच्या शब्दांनी आणि कृतीने देशवासीयांची मने जिंकली आहेत.