नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पाच पैकी चार राज्यात भाजपचा विजय झाला. उत्तर प्रदेश मध्ये भाजप बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, गाझियाबादमधील भाजप आमदाराने विजय मिळताच एक वक्तव्य केले, त्याचे हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत येत आहे.
गाझियाबादमधील लोणी येथून पुन्हा आमदार म्हणून निवडून आलेले नंदकिशोर गुर्जर यांनी त्यांच्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांना इशारा दिला की, माझ्या मतदारसंघ परिसरात मांसाचे एकही दुकान दिसू नये, हे लोणीच्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
तसेच म्हणाले, लोणीत रामराज पाहिजे, म्हणून दूध तूप खा आणि दंड बैठका करा. पण मांस नको. त्यांच्या या वक्तव्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या आधी देखील नंदकिशोर गुर्जर यांनी खळबळजनक वक्तव्ये करून काही समाज घटकांचा द्वेष ओढवून घेतला होता.
जानेवारीमध्ये लोणीच्या बहेटा हाजीपूर गावात निवडणूक प्रचारादरम्यान अलीचे नाव घेणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे गुर्जर म्हटले होते. तसेच समाजवादी पक्षाचा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला होता.
म्हणाले होते की, अलीचे नाव घेणाऱ्यांना लोणी सोडावे लागेल. या निवडणुकीनंतर लोणीत पूर्ण रामराज्य येईल. येवढेच नाही तर समाजवादी पक्ष हा ‘पाकिस्तानी पक्ष’ असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्याने समाजात खळबळ निर्माण होत आहे.
सध्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांपैकी भाजपने 255 जागा जिंकल्या आहेत. तर, समाजवादी पक्षाच्या खात्यात 111 जागा आल्या आहेत. तसेच काँग्रेसला 2 आणि बसपाला फक्त 1 जागा मिळाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकदलाच्या खात्यात 8 आणि जनसत्ता दल डेमोक्रॅटिकने 2 जागा जिंकल्या आहेत. सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि निर्बल भारतीय शोषित हमारा आम दल यांना 6-6 जागा मिळाल्या आहेत.